रोहन संग्रह
महाराष्ट्राने मानव जातीसाठी असाच एक चमत्कार बनून तळपावे, जे कालपर्यंत अशक्य होते, ते आज शक्य करावे, आणि जगाला प्रगतीच्या दिशेने सुखद धक्का देत रहावे! अशी माझी मनोकामना आज महाराष्ट्र दिनादिवशी मला व्यक्त करावीशी वाटते.
प्रत्येक दिवस हा आयुष्यात उत्कर्ष साधण्याची शक्यता निर्माण करतो. आपल्याला मिळालेला वेळ हीच आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठी सुवर्णसंधी असते.
कालोघात लक्षात आलेले विस्मृतीत जाऊन पुन्हा नव्याने तेच ते लक्षात येत राहते. आपल्याला वाटते आपण आयुष्यात खूप दूर आलो आहोत, पण मागे वळून पाहिल्यास लक्षात येते की, आपण जागच्या जागीच घुटमळत आहोत.
अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला ठाऊक असतात, पण आपण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत राहतो. जसे आपण विचार करत आहोत हे आपल्याला माहीत असते, पण आपल्या मनात विचार चालू आहेत याकडे लक्ष नसते.
स्वस्त होणे हे जागृतावस्थेत प्रकट होण्यासारखे, तर महाग होणे हे जागृतावस्थेतून अप्रकट होण्यासारखे आहे.
सत्य-असत्य मानले जाते, ते केवळ सापेक्षतेतील अंतर आहे. विश्वाचा गुणधर्म शाश्वत असला, तरी त्याचे सापेक्षरूप शाश्वत नसावे. म्हणूनच विश्व गुणधर्मरूपात सत्य असले, तरी सापेक्षरूपात, मूर्तरूपात असत्य असावे.
व्यापक हित लक्षात घेऊन तात्कालिक फायदा न पाहता केलेली कृती म्हणजे 'सौजन्य'. मग हे व्यापक हित स्वतःपुरते किंवा स्वतःपलीकडे देखील असू शकते. अशा सौजन्यातूनच सुरुवातीच्या काळात अनेक गोष्टी मोफत मिळतात.
ज्ञानाचे रूपांतर जसे दृष्टीत, तसे दृष्टीचे रूपांतर सरतेशेवटी जनुकांमध्ये होते असे मला वाटते. जर केवळ दृष्टी बदलली, तर अगदी लबाड लांडग्याचे रूपांतर देखील प्रेमळ कुत्र्यामध्ये होऊ शकते.
January 19, 2021 10:11 pm
प्रामाणिकतेतून येणारा आत्मविश्वास उशीरा येतो, पण जेंव्हा तो येतो, तेंव्हा तो अगदी स्वयंसिद्ध असतो. त्याला कोणाच्या पोचपावतीची आवश्यकता नसते. असा स्वयंसिद्ध माणूस निःस्पृहतेने आपले कार्य करतो.
January 18, 2021 11:23 pm
सरळमार्गी आयुष्यात उत्तेजकता कमी, तर आश्वस्तता जास्त असते. दऱ्याखोऱ्यातील प्रवासात आश्वस्तता कमी, तर उत्तेजकता अधिक असते. उत्तेजकता चित्ताकर्षक असली, तरी आयुष्यात प्रत्येकाला आश्वस्तता हवी असते.