वैद्यकीय पेशा हा एका बाजूला पवित्र असला, तरी तो शेवटी एक व्यवसाय आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही. कोणत्याही गोष्टीला आर्थिक चौकट दिल्याखेरीज ती गोष्ट टिकत नाही हे एक नैसर्गिक सत्य असल्याने त्यात वावगे असे काही नाही. पण व्यवसाय करत असताना देखील रुग्णाचे हित प्राथमिकतेने जपले जाईल याची मात्र डॉक्टरांनी दक्षता घ्यायला हवी. परंतु अनावधानाने का असेना अनेकदा प्रत्यक्षात असे घडताना दिसत नाही.
गोळ्या नव्हे, जीवनशैलीत बदल हवा
एखादा रुग्ण डॉक्टरांकडे गेला, तर त्यास गोळ्या दिल्याखेरीज डॉक्टर घरी पाठवत नाहीत. अर्थात रुग्णाची देखील हीच अपेक्षा असल्याने डॉक्टर किंवा रुग्ण यांपैकी कोणासही त्यात वावगे काही वाटत नाही. तरी अनेकदा आजार हा गोळ्यांनी नव्हे, तर जीवनशैलीतील बदलानेच बरा होणार असतो. अशावेळी रुग्णाला गोळ्या देत राहिल्याने केवळ वरकरणी तात्पुरता इलाज झाल्यासारखे वाटते, परंतु सातत्याने गोळ्या घेतल्याने त्याचा शरीरावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय रहात नाही. म्हणूनच जिथे गोळ्यांची नव्हे, तर जीवनशैलीतील बदलांची आवश्यकता असते, तिथे डॉक्टरांनी रुग्णांना तसे सांगायला हवे.
अर्थात डॉक्टर मुद्दामहून जीवनशैलीतील बदल सांगत नाहीत असे नाही, पण अॅलोपॅथीची आयुर्वेदाशी सांगड घालण्याची तसदी अनेकदा घेतली जात नाही, आणि त्याची किंमत रुग्णाला सोसावी लागते. तेंव्हा अशाप्रकारचे प्रशिक्षण हे डॉक्टरांच्या वैद्यकीय शिक्षणाचाच भाग असायला हवे असे मला वाटते. असे झाल्यास समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यात आमूलाग्र सुधारणा होईल यात काही शंका नाही.
Copyright secured by Digiprove © 2021
You must be logged in to post a comment.