January 17, 2021 10:40 pm
एखादी व्यक्ती जर शांत असेल, तर मुळात ती व्यक्ती शांत नसते, त्या व्यक्तीचा विषय वेगळा असतो. एखादी व्यक्ती बोलण्यात कमी पडत असेल, तर आपणही जाणण्यात कमी पडत आहोत हे आपल्या लक्षात यायला हवे.
January 16, 2021 11:32 pm
सहसा माणसाला स्वतःचे शहर आणि त्या शहरातील आपले घर प्रिय असते. हौस म्हणून कधी आसपास पाय मोकळे केले, तरी शेवटी पावले आपसूक घराकडे वळतात. कारण आपलेपणाचा दिलासा हा निवाऱ्यातच असतो.
January 15, 2021 10:28 pm
मुळामध्ये सारेकाही सोपे असले, तरी आपण मूळापर्यंत पोहोचतो का? हा खरा प्रश्न आहे. आयुष्याचे सूत्रधार व्हायचे असेल, तर आपण सुत्र जाणायला हवे. असे केल्यास हळूहळू आयुष्याचे गणित उलगडू लागते.
January 14, 2021 10:55 pm
एखादा विचार जर समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्यासाठी सर्व प्रकारच्या माध्यमातून तो विचार रुजवावा लागतो. हे एकच वस्तू विविधप्रकारच्या आकर्षक वेष्टनातून लोकांसमोर सादर करण्यासारखे आहे.
लेखनाकडे केवळ एक कार्य म्हणून न पाहता, काम म्हणूनही पाहायला हवे. कारण रोजच्या नियमित कामातूनच यथावकाश कार्य घडत जाते. आज माझ्या लेखनप्रवाहाला सलग ५० दिवस पूर्ण होत आहेत याचे मनोमन समाधान आहे.
January 12, 2021 10:46 pm
स्मृतींचा भावनिक बाजार मांडू नये, तर वस्तुनिष्ठ व्यवहार करावा. स्मृतीकडे माहितीस्त्रोताप्रमाणे वस्तुनिष्ठतेने पहावे आणि तिला निर्णयप्रक्रियेत तेवढ्यापुरतेच उपयोगात आणावे.
प्रत्येक माणूस हा दुसऱ्याला नैसर्गिकपणे आपल्या प्रभावक्षेत्रात ओढू पाहतो. हे ग्रहगोलांनी आपापल्यापरीने एकमेकांना गुरुत्वाकर्षणाने खेचण्यासारखे आहे. त्यामुळे या विश्वात वावरत असताना आपल्या आसपासचे ग्रह हे पूरक असावेत.
January 10, 2021 11:21 pm
विचारांच्या चक्रव्यूहात आहोत असे वाटणे हेच मुळात चक्रव्यूह आहे, प्रत्यक्षात आपण चक्रव्यूहात अडकलेलो नसतो. विचारचक्रापलीकडे जायचे असेल, तर खरेतर आपण पलीकडेच आहोत याची उपरती होणे आवश्यक असते.
आपण एखादा चांगला शिरस्ता पकडायचा आणि तो दिवसागणिक पाळायचा. असे करता करता जिथवर आपण पोहोचू, तिथवर आपली वाट आहे असे समजावे आणि बाकी सोडून द्यावे.
आयुष्यात आपल्याला आपली खरी स्पर्धा ओळखता यायला हवी, अन्यथा नसलेली स्पर्धा ओढवून घेतल्याने केवळ पराभवच नव्हे, तर सोबत मानहानी आणि वैफल्यग्रस्तता देखील येऊ शकते.