प्रामाणिक माणसाला जोपर्यंत स्वतःविषयी खात्री पटत नाही, तोपर्यंत तो आयुष्यात चाचपडत राहतो. पण जेंव्हा त्यास तर्कातून नि आकलनातून स्वतःविषयी खात्री पटते, तेंव्हा त्याच्या आत्मविश्वासाला दूर्दम्यता प्राप्त होते. प्रामाणिकतेतून येणारा आत्मविश्वास उशीरा येतो, पण जेंव्हा तो येतो, तेंव्हा तो अगदी स्वयंसिद्ध असतो. त्याला कोणाच्या पोचपावतीची आवश्यकता नसते. असा स्वयंसिद्ध माणूस निःस्पृहतेने आपले कार्य करतो.
पारखण्याचा काळ परीक्षेचा
असत्य जाणणे हेच सत्यापर्यंत पोहचणे असल्याने प्रामाणिक माणूस हा सातत्याने असत्याची पारख करत असतो. असे करता करता एक दिवस तो सत्यापाशी येऊन ठेपतो. पारखण्याचा हा काळ त्याच्यासाठी खऱ्याअर्थाने परीक्षेचा काळ असतो. या कालखंडात आसपासचे लोक शिरजोर भासू शकतात. आपण कोणीच नाही असेही वाटू शकते. पण यथावकाश प्रामाणिक माणूस स्वतःच स्वतःस उमजू लागतो. अशाप्रकारे जेंव्हा त्यास स्वसाक्षात्कार घडतो, तेंव्हा तो इतरांहून आपोआप वेगळा दिसू लागतो.
Copyright secured by Digiprove © 2021
You must be logged in to post a comment.