महाराष्ट्राला अध्यात्मिक अधिष्ठानातून आलेली वैचारिक बैठक असल्याने तो आपल्या अस्तित्वाविषयी, परिस्थितीविषयी अधिक जागृत आहे. जागेपणातील स्वातंत्र्य महाराष्ट्राला ठाऊक आहे आणि त्यामुळे पारतंत्र्यातील वेदनांचीही त्याला जाणीव आहे. समोरच्याचे हित तो त्याच्याही नकळत जाणतो आणि म्हणूनच त्याच्या उत्कर्षासाठी तो निःस्पृहतेने झटतो. सुखनैव स्वप्नरंजनात निजलेल्या माणसावर अचानक गार पाणी टाकावे अशी त्याच्या प्रामाणिकपणातून आलेल्या स्पष्टवक्तेपणाला धार असते, जी माणसाला खडबडून जागी करते. स्वप्नातून बाहेर येत जागा झालेला माणूस कदाचित या फटकळपणावर चिडेल, पण यथावकाश त्यालाही त्या शब्दांतील ममत्त्व कळून चुकेल.
स्वतःपलीकडील कर्तव्याची जाणीव
महाराष्ट्र धर्मातच मुळात स्वतःपलीकडील कर्तव्याची हाक आहे, जी महाराष्ट्राच्या अंतरंगास सदैव साद घालत आलेली आहे. स्वतःपलीकडील हा विचार महाराष्ट्राच्या मातीला एक करतो, सह्याद्रीचे धैर्य देतो, आस्मानी संकटासमोर उभे ठाकण्याचे सामर्थ्य देतो. महाराष्ट्र क्षणिक भावनेतून नव्हे, तर व्यापक हिताच्या जाणिवेतून स्वतःला कर्तव्यासाठी अर्पण करतो. महाराष्ट्र जसा एकीकडे स्पष्टवक्तेपणातून अंतरंगाचा ठाव घेतो, तसा तो दुसरीकडे मनगटातून साक्षात कळीकाळाची परीक्षा पाहतो. महाराष्ट्राच्या नावात जे सामर्थ्य आहे, तेच सामर्थ्य या इथल्या भूमित आहे. निःस्पृहता, उदारता आणि त्याचवेळी स्पष्टता, निर्भिडता हा महाष्ट्राच्या मातीचा गुण आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे! जय महाराष्ट्र!
Copyright secured by Digiprove © 2020
You must be logged in to post a comment.