प्रत्येकवेळी व्यवहारिक दृष्टी न बाळगता काहीवेळा सौजन्याने काम करणे हे व्यापक हिताचे असते. परंतु सौजन्याला देखील सौजन्याची मर्यादा असते. ही मर्यादा जर जाणली नाही, तर सौजन्याच्या जागी व्यवहार कार्यरत होऊ लागतो. प्रत्येकालाच हा व्यवहार परवडेल असे नाही, त्यामुळे सौजन्याला सौजन्याने वेळोवेळी दाद देणे अत्यावश्यक असते.
सौजन्यामागे व्यापक हित
व्यापक हित लक्षात घेऊन तात्कालिक फायदा न पाहता केलेली कृती म्हणजे ‘सौजन्य’. मग हे व्यापक हित स्वतःपुरते किंवा स्वतःपलीकडे देखील असू शकते. अशा सौजन्यातूनच सुरुवातीच्या काळात अनेक गोष्टी आपल्याला मोफत मिळतात. परंतु प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते आणि हे या विश्वातील एक नैसर्गिक सत्य आहे. सौजन्याची परतफेड भविष्यात अपेक्षेप्रमाणे झाली नाही, तर सौजन्याच्या ठिकाणी शुद्ध व्यवहार घडू लागतो. असा व्यवहार अनेकांच्या तात्कालीक कुवतीबाहेर असतो.
म्हणूनच जे आपल्याला सौजन्याने मिळाले आहे त्याची परतफेड आपल्याकडून सौजन्याने व्हायला हवी. ही परतफेड कधी जिथून मिळाले तिथे करावी, तर कधी इतरत्र पुढे न्यावी. कारण सौजन्याची परतफेड ही केवळ आपली नैतिक नव्हे, तर आपल्या अस्तित्वाची जबाबदारी आहे.
Copyright secured by Digiprove © 2021
You must be logged in to post a comment.